भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला अशी कामगिरी करता आलेली नाही. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. पण दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. एकीकडे जगभरात भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचं कौतुक होत असतानाच, बीबीसीचा (BBC) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर लँड होताच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्वीटरला त्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. 


व्हिडीओत नेमकं काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत बीबीसीचा अँकर भारताच्या आंतराळ मोहिमांवर चर्चा करताना दिसत आहे. ही चर्चा चांद्रयान 2 अपयशी झाल्यानंतर करण्यात आल्याचं दिसत आहे. "ज्या देशात पायाभूत सुविधांची कमतरता आहे, खूप गरिबी आहे, 70 कोटी लोकांकडे शौचालयं नाहीत, अशा स्थितीत आंतराळ मोहिमांवर इतका खर्च करावा का?," अशी विचारणा अँकर कार्यक्रमा करताना दिसत आहे. 



आनंद महिंद्रांचं सडेतोड उत्तर


आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओवर व्यक्त होताना, भारताची गरिबी वसाहतवादी राजवटीचा परिणाम आहे. ज्यात मोठ्या प्रमाणावर उपखंडातील संपत्ती लुटण्यात आली असं म्हटलं आहे. तसंच भारताचं सर्वात मोठे नुकसान कोहिनूर हिरा नसून अभिमान आणि स्वत:च्या क्षमतेवरचा विश्वास असल्याचं त्यांनी नमूद केले.


"खरंच तुम्हाला असं वाटतं? सत्य हे आहे की, आमची गरिबी ही अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती, ज्याने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. तरीही आमच्याकडून लुटण्यात आलेली सर्वात मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता. कारण वसाहतीकरणाचे उद्दिष्ट पीडितांना त्यांच्या कनिष्ठतेबद्दल पटवून देणे होते. म्हणूनच शौचालयं आणि आंतराळ मोहिमा या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे हा विरोधाभास नाही. सर, चंद्रावर जाण्याने आमचा अभिमान आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यास मदत होत आहे. त्यातून विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीवर विश्वास निर्माण होतो. हे आपल्याला गरिबीतून बाहेर काढण्याची आकांक्षा देते. महत्वाकांक्षेची गरिबी ही सर्वात मोठी गरिबी आहे,” असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.



भारताने चांद्रयान 3 मोहिमेसाठी 600 कोटी रुपये खर्च केले आहेत. 14 जुलै रोजी भारताने चांद्रयान 3 चं प्रक्षेपण केलं. 41 दिवसांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचं भारताचं उद्दिष्ट होतं. भारताला त्यात यश मिळालं आहे. लँडर मॉड्यूल, लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांचा 26 किलो वजनाचा समावेश असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ सॉफ्ट लँडिंग केले. 


भारताने बुधवारी चंद्रावर लँडिग करत इतिहास रचला आहे. याचं कारण चंद्रावर पोहोचण्याची कामगिरी करणारा भारत हा पहिला देश असला तरी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिलाच देश ठरला आहे. अमेरिका, चीन, रशिया यांनी या मोहिमांसाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत.