Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर आनंद महिंद्रा यांचं भावूक ट्विट
आपल्या जवानांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करायला हवी कारण ते आपले संरक्षण करतात-आनंद महिंद्रा
नवी दिल्ली : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने २०० ते ३०० दहशदवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्याची अधिकृत घोषणा परदेश सचिव विजय गोखले यांनी केली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर वायुदलाने १००० किलोची स्फोटकांसहीत हल्ला केला. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. भारतीय वायूदलाच्या १२ 'मिरज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळं उद्ध्वस्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाने ही कारवाई केली.
भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानच्या दहशतवादी भागात करण्यात आलेल्या हल्ल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय वायुदलाचे आभार मानले. '...आणि ते सुखरूप आपल्या मायदेशी परतले. त्यांनी केलेले कार्य फार आव्हानात्मक आहे. आपल्या जवानांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करायला हवी कारण ते आपले संरक्षण करतात' असे भावनात्मक ट्विट त्यांनी केले आहे.
१४ जानेवारी रोजी पुलवामामध्ये पाक समर्थित जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मंगळवारी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय वायुदल हाय अलर्टवर आहे.