हैदराबाद: तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्याविरुद्ध धर्माबाद न्यायालयाने काढलेल्या अटकेच्या वॉरंटनंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. टीडीपीच्या या कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
 
 या अटकेच्या आदेशामागे भाजपाचे सुडाचे राजकारण आहे. तेलंगणामध्ये टीडीपीने नव्या पक्षांशी युती केल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच आम्हाला घाबरवण्यासाठी भाजपने हा कट रचला आहे, असा आरोप टीडीपीकडून करण्यात आला.
 
 नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात बाभळी येथे ऊच्च पातळी बंधारा बांधण्यात आला होता. गोदावरी नादीवरील या बंधाऱ्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये पाणी जाणार नाही, असा मुद्दा उपस्थित करुन चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधारा उडवून देण्याची धमकी दिली होती.
 
 चंद्राबाबू नायडू यांनी २०१० साली आंदोलनादरम्यान आपल्या आमदार खासदारांसह महाराष्ट्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. 2013 साली हे प्रकरण धर्माबाद न्यायालयात सुनावणीस आले. पण तेव्हापासून एकही वेळ नायडू आणि त्यांचे समर्थक न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी चंद्राबाबू आणि अन्य १३ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले.