Harnath Singh Yadav on Salman Khan: शनिवारी रात्री वांद्रे येथे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गटाने स्वीकारली आहे. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही माहीती दिली. बाबा सिद्धीकी यांना सलमान खानशी जवळीक महागात पडल्याचे म्हटले जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंग आधीपासूनच सलमान खानच्या जीवावर उठले आहेत. दरम्यान भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला एक सल्ला दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी एक्स (आधीचे ट्विटर) वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, 'प्रिय सलमान खान, बिश्नोई समाज काळवीटला देव मानतो. त्याची पूजा करतो. त्याची तू शिकार केलीस आणि ते शिजवून खाल्लेस. यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तुमच्याबद्दल बिश्नोई समाजामध्ये मोठ्या काळापासून रोष आहे. माणसाकडून चुका होतात. तुम्ही मोठे अभिनेते आहात. देशात तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे की, तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा सन्मान करुन मोठ्या चुकीसाठी त्यांची माफी मागायला हवी. 


बिश्नोई गॅंगकडून सोशल मीडियात पोस्ट व्हायरल 



शुभू लोणकर महाराष्ट्र नावाच्या हँडलवरून सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती. ज्या पोस्टमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. ज्यात त्याने लिहिले - 'ओम जय श्री राम, जय भारत. मला जीवनाचे सार समजले आहे. मी शरीर आणि संपत्ती ही धूळ समजतो. मी फक्त एक चांगले काम केले ते म्हणजे मैत्रीचे कर्तव्य. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तू आमच्या भावाला नूकसान पोहोचवलयं.ज्या बाबा सिद्दीकींचे आज गुणगान गायले जात आहे, ते कधीकाळी दाऊदसोबत मकोका कायद्यात होते. अनुज थापन आणि दाऊदला बॉलीवूड, राजकारण, प्रॉपर्टीशी जोडणे हे त्यांच्या मृत्यूचे कारण होते. असे या पोस्टमध्ये लिहिले होते. 


यासोबतच या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'आमचे कोणाशीही शत्रुत्व नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करेल, त्याने आपला हिशोब करुन ठेवावा. जर आमच्यापैकी कोणाचाही भाऊ मारला गेला तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. जय श्री राम जय भारत सलाम शहीद नू, असे यात म्हटले आहे.


मुंबई क्राइम ब्रॅंचकडून तिसरी अटक


महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींची नावे समोर आली आहेत. हत्येतील दोन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. यातील एकजण फरार झाला आहे. मुंबई क्राईम ब्रँचने बाबा सिद्दीकी खून प्रकरणात तिसरा आरोपी प्रवीण लोणकरला अटक केली. तो सुबू लोणकरचा भाऊ असून त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती.