ओदिशा : पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेला  सशर्त परवानगी दिली होती. धार्मिक परंपरांमधल्या बारीक सारीक गोष्टीत न्यायालय लक्ष घालू शकत  नाही, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तसेच मंदिर व्यवस्थापनाने विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असे न्यायालयानं म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिरात पुजाऱ्यांची झुंबड उडाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. राज्य सरकारकडून आश्वासन देऊनही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा  फज्जा उडाला आहे. या यात्रेला येणाऱ्याची संख्या अंदाजे १० लाखाच्या घरात असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने आपण या यात्रेला परवानगी देऊ शकत नाही, असे न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळी म्हटले होते. मात्र, यात्रा सुरु झाल्यानंतर तसे काही होताना दिसून आलेले नाही.


दरम्यान ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आपण केंद्र सरकार आणि मंदिर व्यवस्थापनासोबत योग्य तो समन्वय साधण्यात येईल, असे ओदिशा सरकारने न्यायालयाला सांगितले. तर, राज्य सरकार आणि मंदिर व्यवस्थापानाशी समन्वय राखत, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता या यात्रेचे आयोजन करणे शक्य असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले आहे.



दरम्यान ही सुनावणी केवळ ओदिशातल्या पुरी इथल्या रथयात्रेशीच संबंधित आहे, इतर कोणत्याही ठिकाणाशी संबंधित नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश न्यायमुर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायामुर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या पीठासमोर ऑनलाईन माध्यमातून सुनावणी झाली.