Madhubani Murder Case : सध्याची तरुण पिढी सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेली आहे की ही आभासी दुनियाच (Virtual World) त्यांचं जग बनलं आहे. व्हिडिओत दिसतं तेच खरं असतं आणि तसंच करायचं अशी मानसिकता तरुण पिढीची झाली आहे. मोबाईलवर असे अनेक गेम्स (Mobile Games) आहेत, ज्यात दिलेल्या आदेशाप्रमाणे मुलं वागतात. अनेक वेळा जीव घेण्यात आणि जीव देण्यातही हा मुलं मागेपुढे पाहात नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर दाखवतात तसं मरण्याआधी माणूस खरंच तडफडतो का हे पाहण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी एका कॅब ड्रायव्हरची हत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांच्या तपासात या शाळकरी मुलांनी हत्येची कबुली दिली. मुलांचा जबाब ऐकून पोलिसही हादरले. हत्या कशी करायची हे या मुलांनी सोशल मीडियावर पाहिलं होतं. या मुलांना केवळ एखाद्या माणसाला मरताना आणि मरण्याआधी माणसू कसा तडपतो हे पाहायंच होतं. 


कॅब बूक केली आणि...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8वी, 9वी आणि 11वीत ही तीनही मुलं शिकतात. या तीन मुलांनी ऑनलाईन एक एसयूव्ही कार बूक केली. संशय येऊ नये म्हणून चांगले कपडे घालून ही तीनही मुल कारमध्ये बसली. रस्त्यात सुनसान जागा येताच या तिघांनी ड्रायव्हरला कार थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर तिघांनी कॅब ड्रायव्हरचा निर्घृण खून केला. बिहारमधल्या मधुबनमध्ये (Bihar Madhuban) ही धक्कादायक घटना घडली.


अशी केली ड्रायव्हरची हत्या
ड्रायव्हरने कार थांबवल्यानंतर मागे बसलेल्या दोघांनी ड्रायव्हरचा गळा रशीने आवळला त्यानंतर पुढे बसलेल्या मुलाने ड्रायव्हरच्या गळ्यात खिळे घुसवले. जो पर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत मुलांनी रशीचा फास आवळून धरला. ड्रायव्हर तडपत असताना मुलं जोरजोरात हसत होती, असा कबुलीजबाबही त्यांनी पोलिसांना दिलाय. 


बालसुधार गृहात रवानगी
पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी मुलांनी धक्कादायक कबुली दिली. ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी जितका धडपडत होता तितका आपल्याला आनंद होत होता, त्याला मरताना पाहून मजा वाटत होती, असं आरोपी मुलांनी सांगितंलं. त्या ड्रायव्हरबरोबर मुलांचं कोणतंही भांडण नव्हतं. पण केवळ माणूस कसा मरतो हे पाहण्यासाठी या मुलांनी निष्पाप कॅब ड्रायव्हरची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुलांना अटक केली. त्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्याचे आदेश कोर्टाने दिले. 


या धक्कादयक घटनेने बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. केवळ मजेसाठी एका निर्दोष व्यक्तीचा खून कसा काय केला जाऊ शकतो? पण या घटनेने सोशल मीडियामुळे अल्पवयीन मुलांवर होणारे दुष्परिणाम पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.