Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी समोर आली आहे. भाजपकडून 16 राज्य आणि 2 राज्यांमधील 195 जागेवर उमेदवारी निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर 34 केंद्रिय मंत्र्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, भाजपने महाष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारी जाहीर न केल्याने चर्चेला उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारांच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांचा समावेश आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत विविध जनहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी संकल्प भाजप 370 आणि एनडीएचा 400 'पार' असा आहे, असंही तावडे यांनी यावेळी म्हटलं आहे.


कोणत्या राज्यातून किती जागेवर उमेदवारी जाहीर


भाजपच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 11 जणांचा समावेश आहे. , जम्मू-काश्मीरच्या 5, उत्तराखंडच्या 3, अरुणाचलच्या 2, गोव्याच्या 1, त्रिपुराच्या 1, अंदमानच्या 1, दमण आणि दीवच्या 1 जागांसाठी उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.



गुरुवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती बैठकीची आधी जेपी नड्डा, आमित शाह आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते. ही बैठक जवळपास 3 तास चालली ज्यामध्ये उमेदवारांच्या मंजुरीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यूपी, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि इतर राज्यांचे पक्ष प्रमुख उमेदवारांच्या याद्यांसह पक्षाच्या सर्वोच्च निर्णय मंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी 370 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. 2024 मध्ये 2019 पेक्षा जास्त जागा मिळतील असा भाजपाला विश्वास आहे. पीएम मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला लोकसभेत 400 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जागांबरोबरच व्होट शेअर वाढतील असा पीएम मोदी यांनी भाकित वर्तवलं आहे. 1984 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसने तब्बल 414 जागा जिंकल्या होत्या. भाजपने हा आकडा मागे टाकत ऐतिहासिक विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.