अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकदिलाने लढणार आहेत. पंतप्रधानपदासाठी आम्ही एक नेता ठरवलाय. मात्र, विरोधकांकडे असा कोणताही नेता आहे का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी शहा यांच्याकडून रोड शो काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यात आता कोणतेही वितुष्ट राहिले नसल्याची ग्वाही दिली. आगामी निवडणुकीत आम्ही एकदिलाने काम करणार आहोत. पाच वर्षांपूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्या आता आम्ही विसरलोय. हिंदुत्त्वाच्या ध्यासामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. मी विरोधकांना सांगू इच्छितो की, आमचा नेता एकच आहे. उद्धव यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित जनसमुदायाने मोदी-मोदीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना थांबवत विरोधकांना तुम्ही आमच्यासारखे एकत्र येऊन एकाच नावाचा जयघोष करून दाखवा, असे आव्हान दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांमध्ये एकी नाही. त्यांच्याकडून कायम एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु असतात. आमची मनं जुळली आहेत, मात्र विरोधकांचे केवळ हात जुळलेले दिसतात, अशी टिप्पणी यावेळी उद्धव यांनी केली. तत्पूर्वी या उद्धव यांनी सभेच्या व्यासपीठावर प्रवेश केला तेव्हा अमित शहा यांनी पुढे होत त्यांचे अगत्याने स्वागत केले. त्यामुळे अमित शहा आणि उद्धव यांच्यात पूर्णपणे मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे उद्धव यांनी आपल्या भाषणाचा शेवटही जयहिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा केला. 



अमित शहांच्या आजच्या रॅलीत उद्धव ठाकरे यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी  प्रकाशसिंग बादल आणि रामविलास पासवान हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतीली (रालोआ) बडे नेतेही सहभागी झाले होते.