नवी दिल्ली: भाजप सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हे' वक्तव्य ममता बॅनर्जींच्या पराभवाचे कारण ठरेल- अमित शाह


हेमंत सोरेन यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून आमच्या अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झारखंडला केंद्राकडून अजून एकही व्हेंटिलेटर मिळालेला नाही. आम्ही अत्यंत तुटपुंज्या साधनसामुग्रीसह काम करत आहोत. मात्र, कोरोनाच्या संकटातही व्हर्च्युअल रॅलीजचे आयोजन करणारा भाजप आपल्याच धुंदीत वावरत आहे, अशी टीका हेमंत सोरेन यांनी केली. 



काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. आजच त्यांनी पश्चिम बंगालच्या मतदारांशीही संवाद साधला होता. यावेळी त्यांनी केंद्राच्या धोरणांना विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि 'श्रमिक ट्रेनची' 'कोरोना एक्स्प्रेस' म्हणून हेटाळणी करणे, या दोन कारणांमुळे पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, असेही शाह यांनी म्हटले होते.