नवी दिल्ली : अर्थसंकल्प २०१९ मध्ये ग्रामीण भागावर जास्त भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील २ कोटी लोकांना डिजिटल साक्षर बनवल्याची माहीती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत दिली. पंतप्रधान ग्राम सडक योजनांसाठी ८० हजार २५० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या. दररोज १३५ किमी रस्ता बनवण्याचे लक्ष्य असून सरकारने आतापर्यंत ३० हजार किमी रस्ता बनवला असल्याचेही त्या म्हणाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात ९.६ कोटी शौचालय बनवल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. १० हजार शेतकरी उत्पादक संघ बनवणार असल्याचे सांगण्यात आले. अन्नदाताला ऊर्जादाता बनवणार असल्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. 
कृषीसाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 



७ कोटी पेक्षा जास्त एलपीजी कनेक्शन दिले गेल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. उज्ज्वल सौभाग्य योजनेने गावाचे परिवर्तन झाल्याचे त्या म्हणाल्या. लहान दुकानदारांना ५९ मिनिटात कर्ज मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०२२ पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहचणार असल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी झाला.