नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना गुडन्यूज दिली आहे. मोदी सरकारने (Narendra Modi) गरीब कल्याण अन्न योजनेत  (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) तब्बल 3 महिन्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्यांना डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत या योजनेला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयामुळे देशातील जवळपास 80 कोटी जनतेला थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (central government cabinet extended to pmgky pradhan mantri garib kalyan anna yojana for next 3 month till december 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरीब कल्याण अन्न योजनेचा  (PMGKY)  सप्टेंबर शेवटचा महिना होता. त्यामुळे ही योजना आणखी काही महिन्यांसाठी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच अन्न सचिवांनीही तसे संकेत दिले होते. अखेर सरकारने निर्णय घेत दिलासा दिलाच. "सणासुदीचा मोसम लक्षात घेता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय", अशी माहिती केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलीय.  


पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मार्च 2020 पासून मोफत रेशन देण्यास सुरुवात करण्यात आली होती.  या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन देण्यात आलं. सरकारकडून लोकांना दरमहा 5 किलो मोफत रेशन दिलं जातं. सध्या या योजनेला सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा लवकरच कायापालट


दरम्यान या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा लवकरच कायापालट होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं सीएसएमटी, नवी दिल्ली आणि अहमदाबाद अशा एकूण 3 मुख्य रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रकल्पात तब्बल 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह या तिन्ही स्थानकांचा विकास करण्याची योजना रेल्वेनं कशी आखलीय, याचं खास सादरकीरण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं.