मुंबई: कांदा उत्पादकांसंदर्भात एक मोठा निर्णय केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निर्यातीसाठीचे अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. आतापर्यंत कांद्याच्या निर्यातीसाठी पाच टक्के अनुदान दिले जायचे. ते आता १० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकार करू शकते. काही दिवसांपूर्वीच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गुरुवारी सरकारने अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार एक क्विंटल कांद्यामागे शेतकऱ्यांना २०० रुपये मिळतील. यासाठी सरकारने १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव सातत्याने पडत असल्यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. उत्पादन खर्च प्रति क्विंटल १००० रुपये असताना बाजारात कांदा कवडीमोलाने विकला जात आहे. या पार्श्वभूमीवर निफाडमधील संजय साठे यांनी ७५० किलो कांदा विक्रीतून मिळालेले १०६४ रुपये थेट पंतप्रधान कार्यालयास ‘मनिऑर्डर’ करून शेतकऱ्यांच्या बिकट स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 


पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा ठरतोय फिका


काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १५० ते २०० गाड्या कांदा दाखल झाला होता. मात्र, नाशिकमधील शेतकऱ्यांनी जुना कांदा बाहेर काढल्याने ही आवक गरजेपेक्षा जास्त झाली. परिणामी जवळपास १५०० टन कांदा एपीएमसीमध्ये पडून होता. आवक जास्त असून उठाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ व्यापारी वर्गावर आली आहे. त्यामुळे कांदा सडण्यास सुरुवात झाली होती. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या गडगडणाऱ्या बाजारभावाने शेतकरी हैराण झाला असून उत्पादन खर्चही निघत नाही. यासाठी येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव खिलारे या तरुण शेतकऱ्याने ट्रॅक्टरमधील सहा क्विंटल कांदा येवला बाजार समितीच्या बाहेर येवला-मनमाड रस्त्यावर ओतून दिला होता.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून अनुदान जाहीर