नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियात बँका बंद होण्याच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना सरकार आणि आरबीआयने म्हटलं की, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करण्याचा प्रश्नच नाही असंही आरबीआयने म्हटलं आहे. 


सार्वजनिक क्षेत्रीतील सर्वात मोठी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाला 'प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन' च्या यादीत टाकलं आणि त्यानंतर बँका बंद होण्याच्या अफवा सोशल मीडियात पसरण्यास सुरुवात झाली.


रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, सोशल मीडियात बँका बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे. मात्र, कुठलीही बँक बंद होणार नाहीये. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखीन मजबूत स्थितीत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.


यासंदर्भात वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "कुठल्याही बँकेला बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सार्वजनिक क्षेत्राला मजबूत स्थितीत नेण्यास सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी २.११ लाख कोटीरुपयांचं अर्थसहाय्य करण्याची योजना आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका."



प्रॉम्ट करेटिव्ह अॅक्शनमुळे बँकांच्या दैनंदिन कामकाजावर काहीच परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडियासोबतच आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि यूको बँकेविरोधात पीसीएनुसार कारवाई सुरु केली आहे.