अमरावती, आंध्र प्रदेश : तेलगू देशम पार्टी (टीडीपी)चे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहाल टीका करत, मोदींना दहशतवादी म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी आंध्रतल्या चित्तूरमधल्या सभेत बोलताना, पंतप्रधान मोदी दहशतवादी असून ते चांगली व्यक्ती नाही, असे विधान चंद्राबाबू नायडूंनी केले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान यांना दहशतवादी म्हणणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एवढ्यावरच न थांबता अल्पसंख्याकांना आपण सांगू इच्छितो की तुम्ही नरेंद्र मोदींना मत द्याल तर तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही चंद्राबाबूंनी यावेळी बोलताना दिला. गुजरातमधल्या २००२ सालातल्या दंग्यांचा संदर्भ देत, त्या दंगलींत दोन हजार जणांची हत्या करण्यात आल्याचे नायडू म्हणाले. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींचा राजीनामा मागणारे आपण एकमेव असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.