देहरादून: देशभरात मुसळधार पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानाच्या घटना ऐकायला मिळत असतानाच आता उत्तरकाशीत भयंकर परिस्थिती उद्भवल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे मोठा प्रलय आल्याचे वृत्त आहे. यामुळे लोकांना घरे सोडून जंगलात पळ काढावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आराकोट, मॉकुडी आणि टिकोची या भागांना जलप्रलयाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ढगफुटीमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे आलेल्या पुरात अनेक लोक वाहून गेले आहेत. 


हिमाचल प्रदेशातील आराकोट, मॉकुडी आणि टिकोची ही तिन्ही गावे एकमेकांना लागून आहेत. मात्र, ढगफुटीनंतर आलेल्या प्रलयामुळे या गावांना जोडणार रस्ता वाहून गेल्याची माहिती पोलीस महासंचालक पंकज भट्ट यांनी दिली. 



केदारनाथ धाम परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीने विक्राळ रुप धारण केले आहे. यामुळे नदीवर बांधण्यात आलेला तात्पुरता पूलही पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, ढगफुटीनंतर आराकोट, मॉकुडी आणि टिकोचीमध्ये आपातकालीन पथके पाठवण्यात आली आहेत. 


याशिवाय, पावसामुळे केदारनाथ महामार्गावरील बासबाडाए भीरी, डोलिया देवी, जामू या भागांतही पूर आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या भागात अडकून पडले आहेत. 



या सगळ्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही चमोली दौरा रद्द केला. हवामान खराब असल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.