काँग्रेसच्या (Congress) पक्षाध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीवरुन देशभरात राजस्थानमधील (rajasthan) राजकारणावरुन गोंधळ उडाला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (cm ashok gehlot) यांच्या उमेदवारीवरुन बरेच राजकारण सुरुय. अशोक गेहलोत यांनी मात्र या निवडणुकीतून माघार घेत आपण सोनिया गांधी (sonia gandhi) यांची माफी मागतो असं म्हटलं आहे. अशातच आता राजस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील जोधपूरमध्ये (Jodhpur Stadium) सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावरुन सध्या राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच जोधपूरमध्ये लिजेंड लीग (legend league) क्रिकेटचा सामना झाला. या सामन्याच्या प्रवेशासाठी पासच्या वाटपावरुन राजकारण सुरु झालंय.  सामन्याच्या पास वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत (vaibhav gehlot) यांच्या विरोधात आंदोलनाची तयारी केली आणि शनिवारी संध्याकाळी शहरातील चौकात त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. (Congress ran away vaibhav gehlot statue of BJP brought for the agitation)


मात्र यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याची फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. वैभव गेहलोत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आले होते. जोधपूरच्या रस्त्यावर वैभव गेहलोत यांचा पुतळा घेऊन भाजपचे उत्साही कार्यकर्ते आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात ‘अशोक गेहलोत मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या जात होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत चालणाऱ्या एका व्यक्तीने गनिमीकाव्याने पुतळा हिसकावून पळ काढला. भाजप कार्यकर्त्यांना काही समजण्यापूर्वीच ती व्यक्ती गायब झाली होती.


मात्र पुतळा पळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना घोषणाबाजीशिवाय पर्याय उरला नाही. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काठीला कापड गुंडाळून प्रतिकात्मक नवा पुतळा बनवून त्याचे दहन केले. प्रशासनाच्या मदतीने काँग्रेसवाले पुतळा घेऊन पळून गेल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.



स्टेडियममध्ये 60 रुपयांना पाण्याची बाटली; भाजपचा आरोप


“बरकतुल्ला खान स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट सामन्याचे केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि विशिष्ट समाजाला मोफत पास दिले जात आहेत. तर हा कार्यक्रम संपूर्ण शहराचा आहे. स्टेडियममध्ये 60 रुपयांची पाण्याची बाटली आणि कचोऱ्या शंभर रुपयांना दिल्या जात आहेत. महागाईवरुन ओरड करणारी काँग्रेस शहरातील जनतेची लूट करत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी दरोडेखोरांना देण्यात आली आहे," असे  भाजपचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र जोशी म्हणाले.


दरम्यान, लिजंड लीग क्रिकेटच्या सामन्याच्या पहिल्या दिवसापासून पासच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली होती. वैभव गेहलोत यांनीच आमदार आणि जिल्हाध्यक्षांना दिलेल्या पासची यादी फेसबुकवर प्रसिद्ध केली होती. त्यात वैभव गेहलोतने ज्यांना 50-50 पास दिले होते त्यांची नावे होती. भाजपने त्याला विरोध करण्याचे ठरवले होते.