Jharkhand Crime News: 'अती राग आणि भीक माग' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती देखील वेळोवेळी येत असते. ज्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्याला आयुष्यात खूप काही गमवावं लागत आणि हताश होऊन बसण्याची वेळ येते. जेव्हा त्याला आपली चूक कळते तेव्हा सर्व काही संपून गेलेलं असतं. असाच काहीसा प्रकार झारखंडच्या चतरा जिल्ह्यात घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरगुती वादातून वडिलांची डोक्यात रॉडने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलियाडीह गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.


या घटनेत जन्मदात्या वडिलांचा जागच्या मृत्यू झाला. बापावर जीवघेणा हल्ला करुन मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तांडवा पोलीस ठाण्यात दिली.


घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काली यांचा मुलगा मुन्नी भुईया (३५ वर्षे) हा मद्यधुंद अवस्थेत आपल्या मुलाला मारहाण करत होता. दरम्यान, काली नातवाला वाचवण्याच्या उद्देशाने भांडणं सोडवू लागला. यामुळे मुन्नीला राग अनावर झाला. रागाच्या भरात मुन्नी नातीगोती विसरुन गेला होता. आपला जन्मदाता बाप समोर आहे, हे देखील त्याला समजत नव्हतं. त्या रागातच त्याने वडिलांच्या डोक्यात रॉड मारला. रॉडचा हल्ला इतका जोरदार होता की काली गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.


संबंधित प्रकरणाचा लेखी अर्ज प्राप्त झाला आहे. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात येईल, अशी माहिती तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय कुमार सिंह यांनी दिली. दुसरीकडे या अनपेक्षित घटनेनमुळे घरात कोलाहल झाला आहे. रडून रडून जवळच्या नातेवाइकांची दुरवस्था झाली आहे.