नवी दिल्ली : २०२० हे निवडणुकांचं वर्ष आहे. दिल्ली विधानसभा, बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षात होणार आहेत. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्ली विधानसभा निवडणुका होत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी आणि भाजपची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. गेल्या पाच वर्षात गरीब, सामान्यांसाठी केलेल्या विविध कामांच्या आधारे निवडणुका जिंकण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असेल. बिहार विधानसभेत नितीन कुमार यांची कसोटी असेल. २०१५ मध्ये बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यासह सत्ता मिळवणाऱ्या नितीन कुमारांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरूंगात असलेले लालू, त्यांच्या दोन मुलांमधला बेबनाव नितीश यांच्या पथ्यावर पडेल अशी शक्यता आहे. पण खरं चित्र हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र पाठोपाठ झारखंडमध्ये भाजपने सत्ता गमवल्यानंतर आता दिल्ली आणि बिहारकडे भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे बिहार आणि दिल्लीसाठी भाजपची काय रणनीती असणार याकडे देखील लक्ष असणार आहे. 


दिल्लीत आम आदमी पक्षाने मागच्या निवडणुकीत जोरदार विजय मिळवला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. बिहारमध्ये जेडीयू शिवाय भाजपकडे पर्याय नाही. बिहारमध्ये जेडीयू आपणच मोठा भाऊ असल्याचा इशारा सतत भाजपला देत असतो. शिवाय झारखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपवर नितीशकुमारांनी टीका सुरु केली आहे. जेडीयूला देखील अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे भाजपवर दबावतंत्र वापरलं जावू शकतं.


दिल्लीसाठी भाजपने कंबर कसली असली तरी काँग्रेस देखील कामाला लागली आहे. पक्षाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांच्या नेतृत्वात निवडणूक समिती स्थापन केली आहे. दिल्लीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने अनेक घोषणा केल्या आहेत.