Delhi Police Action on Wrestlers: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात पैलवान गेल्या एका महिन्यापासून अधिक काळापासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी या पैलवानांविरोधात कारवाई केली आहे. जंतर मंतरपासून (Jantar Mantar) ते नव्या संसद भवनपर्यंत (New Parliamentary Builsing) निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच जंतर मंतरवर उभारण्यात आलेले तंबू उखडून फेकून दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंतर मंतर वर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी 23 एप्रिल रोजी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात नव्या संसद भवन इमारतीपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आपल्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार, आंदोलक पैलवान सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी संसदेच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. 


संसदेच्या दिशेने निघालेल्या पैलवानांनी यावेळी बॅरिकेड्स हटवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी साक्षी मलिकसह काही पैलवानांना ताब्यात घेतलं. पैलवान यावेळी शांततेत संसद भवनपर्यंत मोर्चा काढण्यावर ठाम होते. शांततेत मोर्चा काढणं आपला अधिकार असून, दिल्ली पोलीस देशविरोधी कार्य करत असल्याचा आरोप पैलवानांनी केला आहे. 



पोलिसांनी बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर ते तिथेच रस्त्यावर धरणं आंदोलनासाठी बसले होते. याआधी विनेश फोगाटने व्हिडीओ प्रसिद्ध करत महिला महापंचायतीत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व नेत्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. 


दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मलिवाल यांनी फोगाट बहिणींचा एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत संगीता फोगाट आणि विनेश फोगाट दोन्ही बहिणी एकमेकींना मिठी मारुन रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत दिसत आहे. पोलिसांनी जेव्हा पैलवानांना संसद भवनच्या दिशेने जाण्यापासून रोखलं आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दोन्ही बहिणी मिठी मारुन रस्त्यावरच झोपल्या होत्या. 


हा फोटो ट्वीट करत स्वाती मलिवाल यांनी दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे. "या मुलींनी परदेशी जमिनीवर भारताची मान उंचावली आहे. पण आज या मुलींना असं फरफटलं जात आहे आणि तिरंगा रस्त्यावर असा अपमानित होत आहे," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. 



पैलवान बजरंग पुनियाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, आम्ही 11.30 वाजता नव्या संसदेच्या दिशेने जाणार आहे. आम्ही शांततेत जाणार असून पोलिसांनी त्रास देऊ नये असं आवाहन आहे. सर्वांना शांतता राखण्याची विनंती आहे. पुनियाने आरोप केला होता की, पोलीस अधिकारी गैरवर्तवणूक करत आहेत. कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाही आहे. आज महापंचायत होणार असून आम्ही त्यासाठी निवेदन दिलं होतं. पोलीस दिशाभूल करत आहे. 


याआधी विनेश फोगाटने सरकार तडजोडीसाठी आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही तडजोड करण्यासाठी अजिबात तयार नाही. त्यांनी ठेवलेली अट ही बृजभूषण सिंगच्या अटकेसंदर्भात नाही. नवीन संसदेच्या समोर महिला सन्मान महापंचायत होणारच असा निर्धार तिने व्यक्त केला होता.