Earthquake in Rajasthan and Manipur: शुक्रवारी पहाटे राजस्थान (Rajasthan) ते मणिपूरपर्यंत (Manipur) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. एकीकडे राजस्थानमध्ये वारंवार भूकंपाचे (Rajasthan Earthquake) धक्के जाणवत होते, तर दुसरीकडे मणिपूरमध्येही भूकंपामुळे जमीन हादरली होती. जयपूरमध्ये पहाटे 4.09 ते 4.23 पर्यंत तीन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. राजघनीसह राज्यातील इतर शहरांमध्येही पहाटे साडेचार वाजेपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. जयपूरमधील भूकंपामुळे लोक इमारतींमधून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. जयपूरमधील रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 इतकी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मणिपूरच्या उखरुलमध्ये सकाळी 6 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या वेबसाइटनुसार राजस्थानमध्ये पहाटे 4.09 वाजता पहिला भूकंप झाला. दुसरा 4:22 वाजता आणि तिसरा भूकंपाचा 4.25 वाजता जाणवला. या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले आहे. पहाटेच झालेल्या या भूकंपाने झोपलेले सर्वच लोक जागे झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच सर्वजण घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक फोनवर त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती घेताना दिसत होते.



प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरवली डोंगररांगा आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी होती. राजधानी जयपूर आणि आसपासच्या परिसरात पहाटे हे भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, जयपूर आणि राजस्थानच्या इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 24 जानेवारी आणि 21 मार्च रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.



नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सांगितले की, मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील डोंगराळ भागात शुक्रवारी सकाळी भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी होती. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. याआधी मे महिन्यातही उखरूलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.  जमिनीच्या पृष्ठभागापासून 20 किमी खोलीवर झालेल्या या भूकंपामुळे पहाटेच लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.