नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या मदतीला कर्ज देणाऱ्या २६ पैकी २ बँका उभ्या राहिल्या आहेत. याच भूमिकेवर मद्यसम्रामट विजय माल्ल्या याने ट्विट करत आपले पैसे वापरून जेट एअरवेजला वाचवण्याची मागणी भारतीय बँकांकडे केली आहे. कर्नाटक हायकोर्टापुढे पीएसयू बँक आणि अन्य कर्जदारांचे पैसे परत देण्याचा प्रस्ताव मी यापूर्वीच ठेवला आहे, असं म्हणत आपले पैसे बँक का घेत नाही? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीए सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विजय माल्ल्याने केली. सोबतच हेच धोरण किंगफिशर एअरलाईन्स एअरलाईन्स असताना का अवलंबलं गेलं नाही असा सवालही त्याने उपस्थित केला. मी देऊ केलेले ९००० कोटी परत घ्या, जेटला वाचवायला उपयोगी पडतील असा टोलाही मल्ल्याने लगावला.  




'किंगफिशर एअरलाईन्स आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी मी ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. याची दखल कोणी घेतलीच नाही, उलटपक्षी माझ्यावर शक्य त्या सर्व मार्गांनी निशाणा साधला गेला. याच बँकांनी दर्जेदार सेवा देणाऱ्या एका कंपनीचं नुकसान केलं', असं म्हणत मल्ल्याने एनडीए सरकारच्या भूमिकेचा विरोध केला. 




पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणावरुन विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. त्याच्यावर जवळपास ९ हजार कोटींच्या अफरातफरीचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाईन्सला हे कर्ज विविध बँकाकडून देण्यात आलं होतं. २०१६ पासून मल्ल्या भारतातून फरार असून, त्याच्यावर यूके न्यायालात प्रत्यर्पणाचा खटला सुरू आहे.