अहमदाबाद : Hardik Patel Resign: गुजरामधील पाटीदार नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. (Hardik Patel resign from Congress) गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही पत्र लिहून राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.


माझ्या निर्णयाचे सहकारी स्वागत करतील : हार्दिक पटेल


हार्दिक पटेल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करु शकेन.


काँग्रेस विरोधी राजकारणापुरतीच मर्यादित : हार्दिक


हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्षाचे काम देश आणि समाजहिताच्या विरुद्ध असल्याने काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'हे 21 वे शतक आहे आणि भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. देशातील तरुणांना सक्षम आणि कणखर नेतृत्व हवे आहे. गेल्या जवळपास 3 वर्षात मला असे दिसून आले आहे की, काँग्रेस पक्ष केवळ विरोधी राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे. देशातील जनतेला त्यांच्या भविष्याचा विचार करणारा, देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला पर्याय हवा आहे.



प्रत्येक राज्यातील जनतेने काँग्रेसला नाकारले : हार्दिक पटेल


हार्दिक पटेल पुढे म्हणाले, 'अयोध्येतील भगवान श्रीरामाचे मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे असो किंवा जीएसटी लागू करणे असो, देशाला यावर प्रदीर्घ काळ तोडगा हवा होता. काँग्रेस पक्ष यात फक्त अडथळा म्हणून काम करत राहिला. भारत असो, गुजरात असो किंवा माझा पटेल समाज असो; प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यापुरती मर्यादित होती. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. कारण काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेतृत्व जनतेसमोर मूलभूत रोडमॅपही मांडू शकले नाही.


काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वात गांभीर्य नाही : हार्दिक पटेल


आपल्या पत्रात हार्दिक पटेल म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये कोणत्याही मुद्द्याबाबत गांभीर्य नसणे ही मोठी समस्या आहे. मी जेव्हा-जेव्हा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाला भेटलो तेव्हा गुजरातमधील जनतेच्या आणि पक्षाच्या समस्या ऐकण्यापेक्षा नेतृत्वाचा फोकस माझ्या मोबाईल आणि इतर गोष्टींकडे असल्याचे दिसून आले. ज्या वेळी देश संकटात सापडला किंवा काँग्रेसला नेतृत्वाची सर्वाधिक गरज होती, तेव्हा आमचे नेते परदेशात होते, अशी टीका त्यांनी केली.