Hathras Stampede: हाथरसमधील दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभऱात खळबळ उडाली आहे. शिकंदराराऊ येथे सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाच्या (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) सतसंग शिबीरात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा फरार झाला होता. दुर्घटनेनंतर अखेर 30 तासांनी त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाने मृतांप्रती शोक व्यक्त केला असून जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. गुरुवारी जारी केलेल्या आपल्या लिखित संदेशात नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाने काही असामाजिक घटकांमुळे धावपळ झाली असा दावा केला आहे. तसंच आपण या दुर्घटनेआधीच निघून गेलो होतो असाही त्याचा दावा आहे. दरम्यान हे प्रकरण आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. 


सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान भोले बाबाने न्यायालयीन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी एपी सिंग यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. एपी सिंग यांनी याआधी निर्भया प्रकरणातील आरोपी आणि सीमा हैदरचा खटला लढला आहे  


कोण आहेत एपी सिंग?


निर्भया प्रकरणातील आरोपी आणि सीमा हैदर यांचा खटला लढणारे अजय प्रकाश सिंग म्हणजेच एपी सिंग 2012 मध्ये प्रकाशझोतात आले होते. मात्र, या केसमध्ये त्यांना यश मिळालं नव्हतं. तो खटला ते हरले पण त्याच्या युक्तिवादामुळे शिक्षा बराच काळ टळली होती. अखेर निर्भयाच्या दोषींना फाशी झाली. सीमा कुशवाह या निर्भयाच्या वतीने खटला लढत होत्या. या घटनेने देश आणि जगाला धक्का बसला.


एपी सिंह यांनी हाथरस गँगरेपच्या आरोपींची केसही लढवली होती. एका दलित मुलीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर तरुणीचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी वकील एपी सिंह यांनी पीडितेची हत्या तिच्याच भावाने केल्याचं सांगितले होतं. या प्रकरणाचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 


एपी सिंह पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरचा खटलाही लढत आहेत. सचिन मीणासोबत PUBG वरून झालेली मैत्री आणि नंतर प्रेमात पडल्यामुळे सीमा नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. सीमाचं आधीच लग्न झालं होतं. तिला चार मुलंही आहेत. सीमा सध्या सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. तिचा पाकिस्तानातील पतीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत होता. सीमाने 2016 मध्ये पाकिस्तानच्या गुलाम हैदरसोबत लग्न केलं होतं. अलीकडेच गुलाम हैदर यांनी सीमाला परत पाठवण्याची विनंती भारत सरकारला केली होती.


भोले बाबाला वाचवू शकणार का?


भोले बाबाने एपी सिंह यांची वकील म्हणून नियुक्ती केल्यापासून एकच चर्चा होत आहे की भोले बाबावरील आरोप एपी सिंह दूर करू शकतील का? या प्रकरणी एपी सिंह देखील भोलेबाबाच्या शब्दांची पुनरावृत्ती करत आहेत. या घटनेमागे समाजकंटक होते, त्यामुळेच एवढी मोठी घटना घडल्याचा दावा ते करत आहेत. हे सर्व नियोजनाखाली करण्यात आले. सिंह यांनी चरण राज यांचे वक्तव्य खोटे असल्याचं म्हटलं आहे. बाबा कुणालाही पायाला स्पर्श करुदेत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तपासात प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.


हाथरस दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना


दुसरीकडे योगी सरकारने याप्रकरणी कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. या अपघाताची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितले होतं. केंद्र आणि राज्य सरकारनेही यासंदर्भात आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातात बळी पडलेल्या निष्पाप लोकांच्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आम्ही राज्य सरकारकडून उत्तर प्रदेश मुख्यमंत्री बाल सेवा योजनेंतर्गत करू असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. हाथरस दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रजेश श्रीवास्तव, माजी आयएएस हेमंत राव आणि माजी आयपीएस भावेश कुमार सिंह यांचा समावेश आहे.