लखनऊ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पाच संशयित दहशतवादी दिसल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात आणि राज्यात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. घातपाताची शक्यता लक्षात घेता उत्तर प्रदेशात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अनुच्छेद ३७० जम्मू-काश्मीरमधून काढून टाकल्यापासून पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. काश्मीरमधील दहशतवादासाठी अफगाणिस्तान, पश्तो भाषीक दहशतवाद्यांची भरती करीत आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने 'झी मीडिया'ला मिळालेल्या माहितीनुसार काश्मिरी आणि उर्दू भाषा बोलणाऱ्या अतिरेक्यांची संख्या वाढली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे पाकिस्तान लष्कराची आणि पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा आयएसआयची बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ले करण्यास सांगितले आहे.



ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पाच संशयित दहशतवादी फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी दिसल्याने गोरखपूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे उत्तर प्रदेशात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. काही दिवसांपूर्वी एक व्यक्तीने संशयित दहशतवाद्यांची चर्चा ऐकली होती. या पाच दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे दिल्लीत एकत्र येण्याची योजना आखली होती. त्यामुळे हे दहशतवादी याच मार्गे घुसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.