Monsoon In India: मागील काही दिवसांपासून देशभरात अनेक राज्यांमध्ये सातत्यानं तापमानवाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. एकिकडे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये 'रेमल' या चक्रीवादळाचे परिणाम भीती वाढवत आहेत. देशातील हवामानात सतत होणाऱ्या या बदलांमुळं आता मान्सूनच्या (Monsoon) प्रतीक्षेत आणखी भर पडते की काय, अशीच चिंता डोकं वर काढताना दिसत आहे. यासंदर्भातील सर्व चिंता आणि प्रश्नांची उत्तरं देत आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागानं काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IMD च्या माहितीनुसार बांगलादेशच्या किनारपट्टी भागासह पश्चिम बंगालला धडकलेल्या रेमल चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत असून, हे वादळ ताशी 15 किमी इतक्या वेगानं उत्तरेकडे पुढे सरकत असून, त्याची तीव्रता आता आणखी कमी होत जाणार आहे. इतकंच नव्हे, तर या चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होणार आहे. 


देशातील हवामानाची स्थिती सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असून, पुढील 5 दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. आंध्र प्रदेशातील गुटूल स्थित हवामानशास्त्र विभागाच्या केंद्राकडून हा अंदाज वर्तवण्यात आला. 


हेसुद्धा वाचा : ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट 


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनास पूरक वातावरणाची निर्मिती होत असून, पुढच्या पाच दिवसांमध्ये मान्सूनच केरळाच दाखल होणार आहे. याशिवाय हे मोसमी वारे अरबी समुद्रातील दक्षिणेपासून, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्राचं दक्षिण पश्चिम क्षेत्रही व्यापतील. ज्यामुळं केरळच्या काही भागांसह, बंगालच्या उपसागराचा पूर्वोत्तर भाह, देशातील पूर्वोत्तर राज्य आणि लक्षद्वीपमधील काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या दमदार हजेरीची चिन्हं आहेत. 



आयएमडीच्या पूर्वानुमानानुसार मान्सून अंदमान- निकोबार बेटांवर पोहोचला असून, 31 मे किंवा 1 जूनपर्यंत तो केरळात दाखल होणार आहे. पुढं 11 जूनच्या जवळपास तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून, 18 ते 20 जून दरम्यान मान्सून वाराणासीमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होईल. दिल्लीमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख 15 जून सांगण्यात येत असून, त्याशिवाय मध्यप्रदेशात तो 15 ते 20 जून दरम्यान दाखल होणार आहे. तर, 25 ते 30 जूनदरम्यान राजस्थानमध्ये मान्सून धडकणार असून, इथं प्रचंड उकाड्यापासून दिलासा देणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वसामान्य ते अधिक अशा पर्जन्यमानाची शक्यता आहे. त्यामुळं आता या अंदाजानंतर आता सर्वजण आभाळाकडेच लक्ष देत असून या मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत हे खरं.