श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. कट्टरपंथियांनी चर्चेच्या माध्यमातून पुढे यायला हवं, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली. 'हिंसेनं तुम्ही भारताला नमवू शकणार नाहीत. इथले नेते आपल्या मुलांना हे समजावत नाहीत. तुम्ही आमच्याकडून सर्व घ्या... जीवही घ्या... पण प्रेमानं... आणि चर्चेनं... यासाठी नरेंद्र मोदी तयार आहेत, आम्हीही तयार आहोत' असंही यावेळी त्यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा सरकारकडूनही चुका झाल्या आहेत, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली... परंतु, त्यापेक्षा जास्त चुका काश्मीरच्या नेत्यांकडून झाल्याचंही त्यांनी म्हटलं. 'मी हुर्रियतच्या नेत्यांचा सन्मान करतो. त्यांनी खूप काही सहन केलंय परंतु चुकीच्या गोष्टींसाठी' अशा शेलक्या शब्दांत त्यांनी हुर्रियत नेत्यांवर निशाणा साधला.


अनेक पक्षांनी आपल्या निवडणुकांच्या घोषणापत्रांत कलम ३७० आणि कलम ३५ ए बद्दल खूप काही म्हटलंय. त्यावर चर्चाही सुरू आहेत. परंतु, यावर काश्मीरच्या जनतेला चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. ही कलमं रद्द करण्यात येतील, या सर्व अफवा आहेत. असा कोणताही निर्णय एका दिवसात घेतला जाऊ शकत नाही. ही संविधानिक गोष्ट आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं सत्यपाल मलिक यांनी यावेळी म्हटलं.