मुंबई: सत्ताधारी काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सध्या कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर झाले आहे. या सगळ्यामुळे लवकरच एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. या सगळ्या राजकीय नाट्याचा एक अंक मुंबईतही रंगला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि जेडीएसच्या नाराज आमदारांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर चार्टर्ड विमानाने मुंबई गाठली होती. हे सर्व आमदारांना सोफीटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी.के. शिवकुमार पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १६ नाराज आमदारांना गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. काहीवेळापूर्वीच हे आमदार रस्तेमार्गाने गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी सर्व आमदारांना 'मी येत आहे, तयार राहा', असा संदेश दिला होता. 


दरम्यान, कर्नाटकमधील अपक्ष आमदार एच. नागेश आणि आर.शंकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे दोन्ही आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय सर्व नाराज आमदारांना घेऊन गोव्याकडे रवाना झाल्याचे कळते. हे सर्वजण सोफीटेल हॉटेलच्या मागच्या प्रवेशद्वाराने दुपारी पाचच्या सुमारास बाहेर पडल्याचे सांगितले जाते. एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे कर्नाटकमधील राजकारण नाट्यमय वळणवार येऊन ठेपले आहे. 


तर दुसरीकडे 'जेडीएस'नेही आपल्या आमदारांची गळती रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी जेडीएसच्या ३५ आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. आता मंगळवारी कर्नाटकमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. यावेळी भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा करायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय होऊ शकतो. 


लाईव्ह अपडेटस्