नवी दिल्ली: भीषण पूर परिस्थितीमुळे केरळमधील जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिक व विविध राज्ये जमेल त्या मार्गाने केरळमधील जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांनीही पूरग्रस्तांसाठीच्या मदतनिधीसाठी १० हजारांची मदत केली. यानंतर त्यांनी ट्विटवरवरुन याची जाहीर दवंडीही पिटली. तसेच तुम्हीही पेटीएमचा वापर करुन मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्या, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, हा प्रकार काही नेटकऱ्यांना रुचला नाही. त्यामुळे अनेक ट्विटरकरांनी विजय शर्मा यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. 


ज्याच्या घरात लक्ष्मी नांदते त्याने तरी मदत करताना हात आखडता घेता कामा नये, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. टीका झाल्यानंतर लगेचच शेखर यांनी आपले ट्विट डिलीट केले. मात्र, याचे स्क्रीन शॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.