कोलकाता : भाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी केला. कोलकातामध्ये सुरू असलेल्या विरोधकांच्या महासभेत ते बोलत होते. मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे ते म्हणाले. ​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या महाआघाडीने कोलकात्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने संयुक्त भारत मेळाव्याचं आयोजन केले आहे. या मेळाव्याला देशभरातील वीस प्रमुख पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, एच. डी. कुमारस्वामी, अरविंद केजरीवाल, द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, अखिलेश यादव, गेगांग अपांग यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झालेत.  ब्रिगेड ग्राऊंडमध्ये सुरू असलेल्या या जनसभेत ममता बॅनर्जी यांच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षांचे 20 नेते सहभागी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आपला प्रश्न पंतप्रधानांपुरता मर्यादीत नसून विचारधारेशी आहे. गेल्या 56 महिन्यात जे काही झाले ते भारतीय लोकतंत्राच्या दृष्टीने किती धोकादायक होते आपण पाहिले आहे. असे कोणतेही संस्थान नाही जे यांनी बर्बाद केले नसेल. समाज तोडण्याचा, छिन्न विछिन्न करण्याचा यांचा इरादा आहे. जर तुम्ही सरकारचा विरोध केला तर तुम्हाला देशद्रोही ठरवतात असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला आहे. 



हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांची उपस्थितीही लक्षवेधक ठरली. सुभाष चंद्र बोस गोऱ्यांशी लढले होते. पण आपल्याला एकत्र येऊन चोरांशी लढायचे असल्याचे हार्दिक पटेल याने म्हटले. साडे चार वर्षामध्ये दलित, शेतकरी, मध्यमवर्गीयांचे शोषण झाल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी यानी केला आहे. शेतकऱ्यांचे महत्व संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्याने सांगितले.