नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राजस्थानचा राहणारा जवान रोहिताश लांबा देखील शहीद झाला आहे. जवानांच्या कुटुंबियांवर घरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एक वर्षाआधीच रोहिताशचा विवाह झाला होता. ३ महिन्यापूर्वीच त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला होता. पण दुर्दैव असं की शहीद जवान रोहिताश आपल्या मुलीचा चेहरा देखील पाहू शकला नाही. रोहिताश हा होळीला घरी येणार होता. पण त्याआधीच देशासाठी या जवानाला वीरमरण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरवरुन जेव्हा रोहिताशच्या घरी फोन आला तेव्हा रोहिताश शहीद झाल्याची माहिती मिळताच सगळ्यांनाच धक्का बसला. रोहिताश यांचा मोठा भाऊ जीतेंद्र लांबा याची प्रकृती बिघडली आहे. गावातील लोकांमध्ये देखील दु:खाचं वातावरण आहे. संपूर्ण गाव रात्रभर जागं होतं.


जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला एका कारच्या मदतीने करण्यात आला. ज्यामध्ये जवळपास ७० किलो दारुगोळा भरला होता. ही कार सीआरपीएफच्या बसला जाऊन धडकली ज्यामध्ये भारतीय जवान होते. 


सीआरपीएफच्या या ताफ्यात जवळपास २५०० जवान होते. पण अचानक झालेल्य़ा हा हल्ल्यात ४४ जवानांना वीरमरण आलं. या घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राग आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना याचं चोख प्रत्त्यूतर देण्याची मागणी होत आहे.