नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला याला बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून भारताकडून यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, चीनकडून प्रत्येकवेळी या प्रयत्नांमध्ये खोडा घातला जात होता. अखेर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांच्या दबावामुळे चीनने आपली आडमुठी भूमिका सोडली आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून बुधवारी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे यश मानले जात आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानलाही मोठा झटका बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा वर्षांपासून भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने यासंदर्भात भारताने मांडलेला प्रस्ताव चीनने फेटाळून लावला होता. 




चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. यानंतर बीजिंग येथे झालेल्या  पत्रकार परिषदेत चीनने मसूद अजहरच्याबाबतीत नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसून आले. हा प्रश्न पूर्ण चर्चा करूनच सोडवला पाहिजे, एवढेच आमचे म्हणणे आहे. सदस्यांचे बहुमत आणि संवादानंतरच आपण पुढे जाऊ शकतो, असे चीनने म्हटले होते.