नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे येत्या ३० मेला पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच दिवशी कॅबिनेट मंत्र्यांना देखील शपथ दिली जाणार आहे. देशात भाजप आणि एनडीएने प्रचंड मोठा विजय मिळवल्यानंतर आता कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २१ पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये भाजपने २९ पक्षांसोबत निवडणूक लढवली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांची घोषणा केली नव्हती. पण यंदा मात्र आधीच घोषणा केली जावू शकते. कारण एनडीएमधील पक्षांची संख्या कमी आहे. प्रादेशिक पक्षांतील खासदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं. ३० तारखेला ४० ते ४५ मंत्री शपथ घेऊ शकतात. यामध्ये २ ते ३ महिला खासदारांना मंत्रीपद मिळू शकतं.


जिंकलेल्या एकूण खासदारांपैकी १५ टक्के खासदार मंत्री बनू शकतात. एनडीएने लोकसभा निवडणुकीत ३५३ जागा जिंकल्या आहेत, तर एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या आहेत.


पक्ष          मंत्रीपद


भाजप                  ४५+


शिवसेना           ०३ ते ०४


जदयू                ०३ ते ०४


लोजपा                 ०१


आरएलपी            ०१


आजसू                 ०१


अपना दल            ०१


अकाली दल         ०१


कोणत्या राज्यांना प्राधान्य


२०१९ मध्ये हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात तर २०२० मध्ये दिल्ली, बिहार आणि पड्डुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरियाणामध्ये गुर्जर समाजाला खूश करण्यासाठी कृष्ण पाल गुर्जर यांना मंत्री बनवलं जावू शकतं. महाराष्ट्रात शिवसेनेने देखील चांगलं यश मिळवलं आहे. तसेच यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने शिवसेनेचे ३ ते ४ खासदार मंत्री होऊ शकतात. झारखंडमध्ये आजसू पक्षाच्य़ा खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. बिहारमध्ये देखील २०२० मध्ये निवडणुका होत असल्याने जेडीयूला देखील ३ ते ४ मंत्रीपद मिळू शकतात. राजस्थानमधील आरएलपीच्या एकमेव खासदाराला देखील मंत्रीपद मिळू शकतं. जाट समाजाचे लोकं या पक्षासोबत जोडलेले आहेत.


मोदी सरकारमध्ये प्रोफेशन, महिलांची भागीदारी, जातीय गणितं, शहरी-ग्रामीण, एससी-एसटी प्रतिनिधित्व आणि घटक पक्षांना सन्मान, तसेच युवा आणि वरिष्ठ याबाबत ताळमेळ बसवला जावू शकतो.