कोलकाता: भारतीय लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकांवेळी देशातील निधर्मीवादी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. डाव्या पक्षांनीही आढेवेढे न घेता त्यांना साथ दिली पाहिजे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. कोलकाता भेटीदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आपल्याला एकाधिकारशाही, त्यामधून निर्माण होणाऱ्या प्रवाहांविरोधात मत व्यक्त केले पाहिजे. गरज असेल तिथे आपण निधर्मीवादी उजव्या शक्तींना नक्कीच विरोध केला पाहिजे. मात्र, जेव्हा सांप्रदायिकता हाच सर्वात मोठा धोका असेल तेव्हा आपण त्याविरोधात लढताना मागे हटता कामा नये, असे अमर्त्य सेन यांनी सांगितले. 


यावेळी अमर्त्य सेन यांनी भाजप सरकारवरही निशाणा साधला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त ३१ टक्के मतं मिळूनही भाजप सत्तेत आला. भले त्यांनी ५५ टक्के लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला असेल. पण चुकीचा हेतू असलेल्या पक्षाला सत्ता मिळाली, असे अमर्त्य सेन यांनी सांगितले.