नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेनं २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर हल्ला केला. या हल्ल्याआधी जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर ३०० मोबाईल सुरू होते, अशी माहिती आता समोर आली आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुसेनेला पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा भागात हल्ला करण्याची परवानगी दिल्यानंतर एनटीआरओ(नॅशनल टेकनिकल रिसर्च ऑर्गनायजेशन)नं जैश-ए-मोहम्मदच्या या तळावर पाळत ठेवली होती.


२६ फेब्रुवारीला १२ मिराज २००० विमानं बालाकोटमध्ये घुसली आणि जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर  एक हजार किलोचे २ हजार बॉम्ब टाकले.


'एअर स्ट्राईकच्या आधी बालाकोटमधल्या जैशच्या अड्ड्यावर ३०० मोबाईल सुरू होते. या अड्ड्याचा आम्ही खात्मा केला. गुप्तचर यंत्रणांनी दिलेली बालाकोटमध्ये असलेल्या एकूण दहशतवाद्यांच्या संख्येला एनटीआरओच्या माहितीमुळे पुष्टी मिळाली.' असं या ऑपरेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या एकानं सांगितल्याचं वृत्त एएनआयनं दिले आहे.


'मृतदेह मोजणं आमचं काम नाही'


जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्याबद्दल भारतीय वायुसेनेचे प्रमुख बीएस धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. बालाकोट येथे एअर स्ट्राईक झाला असून, यामध्ये दहशतवादी तळांवर निशाणा साधला गेल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.


एखाद्या ठिकाणाला निशाणा करुन तेथे हल्ला करण्याचं ठरवण्यात आल्यानंतरच आम्ही त्यावर निशाणा साधतो. आणि इथे आम्ही तो साधला. नाहीतर पाकिस्तानने या प्रकरणी वक्तव्य का केलं असतं? असा प्रश्न धानोआ यांनी उपस्थित केला. भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकच्या पुराव्यांची मागणी काही विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं होतं. ज्यांना धानोआ यांनी पूर्णविराम दिला.


वायुदलाने ठरलेल्या ठिकाणी हल्ला करत शत्रूला उध्वस्त केलं असल्याचं म्हणत या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले याविषयीचा अधिकृत आकडा सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. याविषयीची माहिती सरकारकडून देण्यात आल्याचं म्हणत मृतदेहांची मोजदाद हे आमचं काम नसल्याचं त्यांनी सांगितलं.