Odisha Train Accident: ओडिशामधील (Odisha Train Accident) बालासोर येथील दुर्घटनेनंतर 51 तासांनी ट्रॅकवर पहिली ट्रेन धावली आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी ट्रेन जाताना हात जोडून अभिवादन केलं. दोन्ही रेल्वे ट्रॅकवर सेवा सुरळीत करण्यासाठी संपूर्ण टीम झोकून काम करत होती असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. तसंच ते म्हणाले की, "या दुर्घटनेबद्दल आम्हाला दु:ख आहे. आम्ही याप्रकरणी सखोल चौकशी करणार आहोत. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल". दरम्यान यावेळी त्यांनी घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी वैष्णव रात्री 11 वाजता घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, संपूर्ण टीमने अत्यंत तत्परतेने काम करुन दोन्ही ट्रॅक सुरळीत केले आहेत. दुर्घटनेच्या 15 तासानंतर सेवा सुरळीत झाली आहे. दोन्ही ट्रॅक तपासण्यात आले असून, दोन्ही ट्रॅकवर ट्रेन सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. 



रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी संध्याकाळी भुवनेश्वर येथे एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, मुख्य लाईनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. यादरम्यान आम्ही जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. रेल्वेने याप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपवला जावा अशी शिफारस केली आहे. सर्व परिस्थिती लक्षात घेत तपास सीबीआयकडे सोपवला जाईल. 


ओडिशामधील बालासोर येथे ही दुर्घटना घडलेली असून घटनास्थळी 24 तास युद्धपातळीवर काम केलं जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. हजारो रेल्वे कर्मचारी, बचावकार्य पथकं, तंत्रज्ञांपासून ते इंजिनिअर्स सर्वजण दिवसरात्र काम करत आहेत. घटनास्थळी दुर्घटनेनंतर असणारं भीषण चित्र आता बदलत आहे. ट्रॅकवरील ट्रेनचे डबे आता हटवण्यात आले आहेत. 


दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी सीबीआय तपासाची शिफारस केली असली तरी दुसरीकडे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून तपास सुरु राहणार आहे. आयोगाकडून सर्व बाजूंनी तपास केला जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालय सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, सीबीआयने रेल्वे अपघाताची चौकशी करण्याची ही पहिली वेळ नसेल. 


ओडिशा दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी ट्रेनच्या डब्यांमधील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनेत आतापर्यंत 275 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रुग्णालयांमध्ये बेवारस मृतदेहांचा अक्षरश: ढीग लागला आहे. रुग्णालयाच शवगृहात मृतदेह ठेवण्यासाठी जागा उरलेली नाही अशी परिस्थिती आहे.