नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानातल्या तणावामुळे अवघा देश चिंताग्रस्त असताना, भाजप आणि काँग्रेसचं मात्र कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी मेरा बुथ सबसे मजबूत अशी भाजपाची मोहीम सुरू केल्यानंतर, काँग्रेसनंही मेरा जवान सबसे मजबूत असा टोला लगावला. भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी अवघा देश प्रार्थना करत आहे. पण राजकारण्यांना त्याचं काहीच सोयरसूतक नाही. भारत आणि पाकिस्तान युद्ध होणार का, अशा चिंतेत देशवासीय असताना, सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे नेते मात्र राजकारणात मश्गूल आहेत. दरम्यान, पाकिस्तान संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना उद्या सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्या वाघा बॉर्डरवरुन ते भारतात परत येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी देशाला कुणासमोरही झुकू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. पण पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत कारवाया सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र गुरूवारी मेरा बुथ, सबसे मजबूत ही भाजपाची नवी राजकीय मोहीम सुरू केली. अर्थात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, भारतीय सैनिकांच्या पाठिशी उभे राहण्याचं आवाहन करायला ते विसरले नाहीत.


भाजपच्या या मेरा बुथ सबसे मजबुत मोहीमेवर नेटिझन्सनी देखील जोरदार आक्षेप घेतला. मेरा जवान सबसे मजबुत असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. काँग्रेसनेही यानिमित्तानं भाजपवर टीकेची आयती संधी साधली. सीमेवर जवान प्राण पणाला लावून पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडे राजकारण्यांना मात्र लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत.राजकारण्यांची कातडी किती गेंड्याची आहे, हेच यावरुन सिद्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.