नवी दिल्ली : बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेवर उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर आगपाखड केलीय.


'तीन तलाक' विधेयकावर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी ४ वाजल्याच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी राज्यसभेला संबोधित केलं. 'तीन तलाक' विधेयकाला ब्रेक लावण्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. 'जर हिंदू व्यक्ती दोन विवाह करून तुरुंगात गेला तर त्याच्या कुटुंबाचं पालन-पोषण कोण करणार?' असा प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित केला. 


'तीन तलाक'च्या विधेयकात असा तलाक देणाऱ्या व्यक्तीला तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. त्यावर, आरोपी तुरुंगात गेला तर पीडित महिलेचं पालन-पोषण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करत या विधेयकाला राज्यसभेत ब्रेक लागला होता.


काँग्रेसमुक्त भारत?


काँग्रेसच्या 'नेम चेंजर' टीकेला प्रत्युत्तर देताना आपला 'नेम चेंजर' नाही तर 'ऐम चेंजर' म्हणजेच लक्ष्यचा पाठलाग करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं. 


'काँग्रेसनं कधीही लाल किल्ल्यावरून दुसऱ्या सरकारचं कौतुक केलं नाही... पण मी ते केलं... भाजपवर टीका करता करता तुम्ही भारतावर टीका सुरू करता... मोदीवर हल्ला करताना तुम्ही हिंदुस्तानावर हल्ला करता' असंही आपल्या भाषणात मोदींनी म्हटलंय. 


इतक्यावरच ते थांबले नाहीत तर 'तुम्हाला गांधीजी वाला भारत हवाय, मलाही गांधीजी वाला भारत हवाय. गांधीजींनी म्हटलं होतं, आता स्वातंत्र्य मिळालंय आता काँग्रेसची गरज नाही' असं म्हणत त्यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'ची री ओढलीय.