नवी दिल्ली: दुसऱ्यांवर चिखलफेक करायची. खोट्या बातम्या पसरवायच्या. वारंवार खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची, हाच काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे. स्वत:कडच्या खोट्या गोष्टी खपवण्यासाठी काँग्रेस निर्लज्जपणाचा आधार घेत असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनी शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. 


 यावेळी मोदी म्हणाले की, भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले आहे. इंदन वाढले तरीही भाजपने रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले नाहीत. महागाईला नियंत्रणात ठेवले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हा दर १० टक्क्यांवर होता. आमच्या सरकारच्या काळात महागाईदर तीन ते चार टक्क्यांपर्यंत खाली आला, असे मोदींनी सांगितले.