नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ५ न्यायाधीशांची समिती याप्रकरणी दुपारी इन चेंबर सुनावणी करणार आहे. न्यायाधीशांच्या या समितीमध्ये एस ए बोबडे, अशोक भूषण, डी वाय चंद्रचूड, एस अब्दुल नजीरसह संजीव खन्ना या न्यायाधिशांशी नाव आहेत. ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी दिलेल्या निकालावर मुस्लीम पक्षकारांनी विरोध दर्शवत ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या अध्यक्षेतत पाच न्यायाधीशांचं खंडपीठ दुपारी १.४० मिनिटांनी सुनावणी करणार आहेत. न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस.ए नजीर आणि न्यायाधीश संजीव खन्ना या खंडपीठात असणार आहेत. न्यायाधीश खन्ना फक्त याआधीच्या सुनावणीत खंडपीठाचे भाग नव्हते. १७ नोव्हेंबरला माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यानंतर न्यायाधीश खन्ना यांचा या खंडपीठात समावेश करण्यात आला आहे.


सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करायची की नाही यावर आज निर्णय देणार आहे. याआधीचा निर्णय हा राममंदिराच्या बाजुने आला होता. २.७७ एकर जमीन ही राममंदिराला देण्यात यावी आणि बाबरी मशीदसाठी दुसरी जागा द्यावी असा निर्णय कोर्टाने दिला होता. मशिदीसाठी केंद्र सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.


निर्मोही आखाड्याने देखील अयोध्या प्रकरणात बुधवारी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला राममंदिर बनवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करुन त्यामध्ये निर्मोही अखाड्याला प्रतिनिधित्व देण्याचे आदेश दिले होते. निर्णयाच्या एक महिन्यानंतर ही ट्रस्टमध्ये अखाड्याची भूमिका स्पष्ट झालेली नाही.