नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वच देशांची अर्थव्यवस्था ठप्प झालीय. अशावेळी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशाअंतर्गत काही कामांना परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. या पार्श्वभुमीवर देशातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याची परवानगी आहे. तर इतर ७५ टक्के कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकट आल्यानंतर जगभरातील अनेक समीकरणं बदलली. लोकांच्या जीवनशैलीत देखील महत्वाचे बदल झाले. सर्वजण स्वच्छतेबाबत जागरुक झाले. सोशल डिस्टंसिंगचं महत्व सर्वांना पटू लागलं. यासोबतच वर्क फ्रॉम होम ही संकल्पना देखील जगभरात रुजू लागली. भारतात टीसीएसने मोठा निर्णय घेऊन याची मुहूर्तमेढ रोवली. टीसीएसमध्ये सध्या ३ लाख ५५ हजार कर्मचारी काम करत आहेत. यातील २.६ लाख कर्मचारी वर्क फ्रॉम होम करु शकणार आहेत. हा निर्णय केवळ लॉकडाऊनपुरता मर्यादित नसेल. तर पुढच्या पाच वर्षांसाठी राहणार आहे. 
२०२५ पर्यंत टीसीएसचे ७५ टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. दरम्यान या संकल्पनेला किती यश मिळालं ? याची तपासणी होईल आणि पुढचा निर्णय ठरवण्यात येईल. टीसीएसमध्ये राबवण्यात येत असलेल्या या संकल्पनेला मॉडेल २५ असं नामकरण करण्यात आलंय.