पाटणा: चारा घोटाळाप्रकरणी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरातील कौटुंबिक कलह आणखीनच चिघळला आहे. लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद सुरु आहे. ऐश्वर्याने नुकताच घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला होता. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात खटके उडायला लागले होते. लालूंच्या घरातील या कौटुंबिक कलहाची नेहमीच चर्चा रंगताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, शुक्रवारी ऐश्वर्या राय आपल्या सासूबाई राबडी देवी यांच्या निवासस्थानाहून रडत रडत बाहेर पडल्या. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असला तरी त्या बराचवेळ आपल्या सासरी असतात. येथून ऐश्वर्या यांचे वडील राजदचे आमदार चंद्रिका राय यांचे घरही जवळ आहे. मात्र, आता लालूंच्या घरच्यांनी ऐश्वर्या यांना घरातून निघून जाण्यास सांगितल्याची चर्चा आहे. या प्रकारानंतर ऐश्वर्या घरातून रडत बाहेर आल्या व वडिलांच्या गाडीत बसून निघून गेल्या. 


ऑगस्ट महिन्यात ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यांना अमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. आपण सासरच्यांना या गोष्टीबद्दल सांगितले. मात्र, त्यांनी कोणतीही मदत करण्यास नकार दिल्याचे ऐश्वर्या यांनी म्हटले होते. 


ऐश्वर्या यांनी दिल्लीहून मॅनेजमेंज पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे आजोबा दिवंगत दरोगा प्रसाद राय १९७० च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री होते. खुद्द लालूंनी हा घटस्फोट होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण ते व्यर्थ ठरले.