मुंबई : ऐन सणासुदीच्या दिवसांत महागाईचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या खर्चाचं गणित कोलमडून गेलं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्याच वर्गाच मोडणाऱ्या भाज्यांचे दरही गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे आता खर्च नेमका ठरलेल्या पैशांत कसा बसवायचा हाच प्रश्न सर्वांपुढे उभा ठाकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याची बाब सध्या स्पष्ट होत आहे. दिल्लीमध्ये बाहेरून येणाऱ्या भाजीपाल्यावर याचे परिणाम दिसून येत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये दिल्लीत मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांदा पोहोचतो. पण, या दोन्ही राज्य़ांमध्ये झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या दरांचाही यावर परिणाम होताना दिसत आहे. 


टोमॅटोचे दर प्रती किलोमागे 80 रुपयांवर पोहोचले आहे. दुपटीपेक्षाही अधिक दरानं झालेली ही वाढ पाहता रोजच्या जेवणामध्ये लागणाऱ्या या भाजीची खरेदी करताना आता दोनदा विचार केला जात आहे. पालेभाज्या आणि इतर फळभाज्यांच्या दरांचं चित्रही काहीसं असंच दिसत आहे. 


व्य़ापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशातील बहुतांश भागात पावसाचं प्रमाण यंदा जरा जास्त दिसून आलं आहे. काही भागांतून अद्यापही पाऊस ओसरलेला नाही. ज्यामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळंच भाजीपाल्यांचे दर वधारले आहेत. शिवाय इंधनाची दरवाढ झाल्यामुळं शेतमालाची ने- आण आणि त्याच्य़ा स्वच्छतेसाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. ज्याचे थेट परिणाम कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या दरावर होत आहे.