अमृतसर : शुक्रवारी अमृतसरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक जण रेल्वे रुळावर येऊन उभे होते. त्याच वेळी वाऱ्याच्या वेगानं येणाऱ्या जालंदरहून अमृतसर मेलनं रुळावर उभे असलेल्या अनेकांना चिरडलं. या अपघातात किमान ६० जणांचा मृत्यू झाला असून सत्तरहून अधिक जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.


कसा घडला हा अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृतसरमध्ये हा भीषण अपघात कसा घडला त्याची ही दृश्यं आहेत. रावण दहनासाठी हजारोंच्या संख्येनं लोकं जमलेली होती. या मैदानाच्याच बाजुला रेल्वे रूळ आहे. या रुळावरही रावण दहन पाहण्यासाठी लोकं उभी होती. मात्र फटाक्यांचा आणि आतषबाजीच्या आवाजामुळे लोकांना रेल्वे आल्याचं कळलंच नाही आणि थेट अनेकांना चिरडून ही रेल्वे वाऱ्याच्या वेगानं पुढं गेली.


सरकारकडून मदत जाहीर


घटना घडली त्यावेळी समोरच्या बाजुनंही दुसरी गाडी आल्यामुळे लोकांना पळायला संधीच मिळाली नसल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केलीय. तर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी अमेरिकेतले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मायदेशाकडे धाव घेतलीय.


दुसरीकडे यावरून राजकारणही सुरू झालाय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नी नवज्योत कौर अपघातानंतर गाडीत बसून निघून गेल्याचा आरोप काही जणांनी केला. मात्र आपण पळून गेलो नाही, तर जखमींना घेऊन रुग्णालयात आल्याचा दावा कौर यांनी केलाय.