कोलकाता : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं राज्य कोणतं असेल तर ते होतं पश्चिम बंगाल. निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडताच सर्व माध्यमांनी एक्झिट पोलचे आकडे दिले. ज्यामध्ये ममता बॅनर्जींना धक्काच बसला. कारण ममतांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं सुरुंग लावला आहे. त्यामुळे दीदींचं राज्य संपुष्टात येतं की काय अशी देखील आता देशात चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीत सर्वाधिक हिंसा पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे दीदींचं बंगाल चांगलंच चर्चेत आलं. भाजपने पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण ताकद झोकून दिली होती. भाजपने येथे प्रचंड मेहनत घेतली होती आणि त्याचं फळ देखील त्यांना मिळतांना एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. 


बंगालचा एग्झिट पोल


एक्झिट पोल

भाजप

टीएमसी

काँग्रेस

पोल डायरी

19

19

03

टाईम्स नाऊ

11

28

02

चाणक्य    

18

23

01

सीओटर

11

29

02

इंडिया टुडे

        19-23

         19-22

00

एबीपी नेल्सन

16

24

02


पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. त्यामुळे देशात सत्ता येण्यासाठी येथे जास्तीत जास्त जागा जिंकणे भाजपसाठी महत्त्वाचं होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये फक्त २ जागा मिळाल्या होत्या. मोदी लाट असतानाद देखील तृणमूल काँग्रेसला २०१४ मध्ये ३३ जागा मिळाल्या होत्या.


का बसला ममतांना धक्का?


पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षापासून सत्तेत असलेल्या सीपीएम सरकारला ममतांनी 2011 मध्ये पराभवाचा धक्का दिला. विधानसभा निवडणुकीत 294 पैकी 184 जागांवर विजय मिळवत ममता बॅनर्जी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसला यश मिळवता आलेलं नाही. पण बंगाल सारख्या मोठ्या राज्यात भाजपने तृणमूल काँग्रेसला पर्याय देण्याचा विचार केला. 


पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या हिंदूंना आपला आधार बनवत भाजपने ममतांवर भेदभाव केल्याचा आरोप केला. सरस्वती पूजा, मूर्ती विसर्जनवर बंदी आणि मोहरमला दिली जाणारी सूट याला मुद्दा बनवत भाजपने ममतांवर टीका केली.


बंगालमध्ये भाजपवर विश्वास का वाढला?


रामनवमीची शोभायात्रा असो किंवा प्रतिमा विसर्जन या मुद्द्यावर ममतांच्या हट्टीपणाला भाजपने कोर्टात आव्हान दिलं. जेथे ममतांना धक्का बसला. भाजपने येथे हिंदूंचा विश्वास जिंकला.


भाजपचं वाढतं वर्चस्व पाहता टीएमसीने देखील हालचाली सुरु केला. निवडणुकी दरम्यान येथे दोन्ही पक्षांमध्ये वाद पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी हिंसा देखील झाली. भाजप नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या होऊ लागल्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली.


टीएमसी आणि सीपीएममध्ये देखील अशीच लढाई होती. तेव्हा देखील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मारले जात होते. 


पश्चिम बंगाल आणि कोलकातामध्ये बांगलादेशचे लोकं अवैधपणे राहत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या विरोधात नेहमी नरमाईची भूमिका घेतली. तर दुसरीकडे रोजगार आणि गरिबीची समस्या असताना भाजपने सत्तेत आल्यास बंगालमध्ये एनआरसी लागू करत सर्व अवैधपणे राहणाऱ्या देशातून बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं आहे.


ममता बॅनर्जी यांनी एनआरसीला विरोध केला. राज्यात एनआरसी कधीच लागू होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं. याचाच मुद्दा बनवत भाजपने पुन्हा ममता दीदींना लक्ष्य केलं.


ममतांपुढे आता पर्याय काय?


एग्झिट पोलमध्ये समोर आलेले आकडे जर सत्य ठरले तर राज्यात ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह येखे विशेष लक्ष देतील. पण येणाऱ्या काळात येथे दोन्ही पक्षांमधील संघर्ष आणखी वाढण्य़ाची शक्यता आहे.


ममता बॅनर्जी यांच्यापुढे दुसरा पर्याय असा असू शकतो की, आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी वाजपेयींच्या सरकारप्रमाणे मोदी सरकारमध्ये ही त्या सहभागी होऊ शकतात. शेवटी हे राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं.


तिसरा पर्याय म्हणून ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेससोबत निवडणुका लढवू शकतात. दुसरीकडे जवळपास संपुष्टात आलेली सीपीएम अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा देऊ शकतो.