Tirupati Laddoo Row: वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन रेड्डी (YS Jagan Reddy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमवर (टीटीडी) लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा दावा करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगन रेड्डी यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये (Tirupati Laddu) प्राण्यांची चरबी (Animal Fat) वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत. 


प्रसादम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी TTD कडे कठोर प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणी आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की तूप खरेदीमध्ये ई-टेंडरिंग प्रक्रिया, एनएबीएल-प्रमाणित प्रयोगशाळा चाचण्या आणि बहु-स्तरीय तपासण्यांचा समावेश होतो. तेलुगु देसम पक्षाच्या (टीडीपी) राजवटीतही अशीच प्रक्रिया होती, असं त्यांनी सांगितलं. 


जगन रेड्डी यांनी यावेळी खोटे आरोप TTD च्या प्रतिष्ठेला आणि भक्तांच्या विश्वासाला गंभीरपणे नुकसान पोहोचवू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं आहे की, त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या कृतीबद्दल फटकारले पाहिजे आणि सत्य उघड करावे जेणेकरुन भक्तांचा विश्वास आणि भक्ती पुन्हा स्थापित होईल. राज्यातील नव्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत असतानाच हे पत्र समोर आलं असून, याच दरम्यान चंद्राबाबू नायडू यांनी एका राजकीय सभेत ही वादग्रस्त टिप्पणी केली होती.


टीटीडीच्या कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रणालीमुळे तुपाचा टँकर नाकारण्यात आल्याच्या घटनेच्या दोन महिन्यांनंतर या टिप्पण्या आल्या. वायएस जगन यांनी पुनरुच्चार केला की चंद्राबाबू नायडू यांचे बिनबुडाचे दावे त्यांच्या सरकारच्या अपयशावरून लक्ष हटवण्याचा आणि त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. तिरुमला मंदिराचे पावित्र्य जपले जावे आणि भाविकांच्या भावनांना धक्का पोहोचू नये यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना करण्यात आली आहे.