मुंबई : 11th online admission extended : मुदत संपुनही अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाविनाच आहेत. अखेर अकरावीच्या प्रवेशाला (11th admission) 21 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचाय. 10 पास आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रवेशाची संधी या मुदतवाढीत मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरावी ऑनलाइन (11th online admission) प्रवेशप्रक्रिया काल संपली असली तरीही अद्याप अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थी 21 ऑक्टोबर दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.


अकरावी प्रवेशाची मुदत संपूनही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या सूत्रानुसार प्रवेश प्रक्रियेला दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.


मुदतवाढीच्या दरम्यान सर्व 10 पास आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. कॉलेजमधील रिक्त जागांसाठी सर्वात प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित जागा अलॉट होणार आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या मुदतीत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. 


10 वीच्या फेरपरीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत निकाल जाहीर झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. आतापर्यंत मुंबई विभागातून अकरावीचे 89.71 टक्के प्रवेश झाले आहेत. ऑनलाइन अर्ज केलेल्या एकूण 2 लाख 52 हजार 115 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 26 हजार 168 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर 10.29 टक्के म्हणजेच 25 हजार 947 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. मुंबई विभागात अकरावीच्या 95 हजार 372 जागा रिक्त आहेत.