Aaditya Thackeray On Cm Eknath Shinde: कोस्टल रोड प्रकल्पाचे 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मात्र, उद्घाटनाच्या आधीच आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर श्रेय लाटल्याचा आरोप केला आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना कोस्टल रोड पूर्ण झालेला नसतानाही त्याचे उद्घाटन केले जात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच, मुंबईच्या रेसकोर्सबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषेदत घेत महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई रेसकॉर्सवर होणाऱ्या सेंट्रल पार्कबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे.  'मुंबई रेसकॉर्सवर 226 एकरची मोकळी जागा आहे. तिथे हजारो मुंबईकर व्यायामासाठी जात असतात. तिथे कार्यक्रम होत असतात. सामान्य नागरिकांसाठी खुली असणारी एकमेव जागा ही मुंबई रेसकोर्सची आहे. त्या जागेवर सुरुवातील क्लब उभारण्याचा घाट घातला जात होता. मात्र आता तो प्रकल्प रद्द करत मुंबई रेसकॉर्सवर थीम पार्क नव्हे तर सेंट्रलल पार्क होणार असल्याचे समोर येतेय,' असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. 


'मुंबई रेसकॉर्सच्या इथेच भूमिगत कार पार्किंग करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र आमचा या कार पार्कला विरोध आहे. कारण बाजूलाच कोस्टल रोड आहे. तिथे दोन हजार भूमिगत कार पार्किंगची व्यवस्था असतानाच बाजूलाच ही नवीन कार पार्किंग कशाला? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. कोणत्या कंत्राटदार मित्रासाठी तुम्ही हे कार पार्क करत आहेत,' असंही त्यांनी म्हटलं आहे. 


आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की,  'मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईकरांच्या खिशातले त्यांच्या कराचे शंभर कोटी रुपये पैसे घोड्याच्या तबेलासाठी वापरले जाणार आहेत. हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत. सुटबुटातल्या लोकांसाठी मुंबईकरांचे पैसे वापरण्यात येणार आहे. तसंच, रेसकॉर्सवर काम करणाऱ्या लोकांना स्लम्स म्हणून जाहिर केले आहे. त्यांना बाजूलाच एसआरएमध्ये समावून घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण कोणत्या SRA मध्ये अॅडजस्ट करणार आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे,' असा आरोप आदित्य यांनी मुंबई माहापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना उद्देशून केला आहे.


'ही बातमी समोर आल्यानंतर लोक मोठ्या संख्येने विरोध करत आहेत. पण प्रशासक काही ऐकायला तयार नाहीयेत. कारण असं ऐकलं आहे की, मनपा आयुक्तांना मोठ्या पोस्टवर दिल्लीत जायचं आहे. त्यासाठीच  ते नियमबाह्य कामे करत आहेत,' असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. 


भूमिगत कार पार्कला आमचा विरोध आहे. बिल्डर मित्रासाठी हा खटाटोप आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. मुंबईकरांचा एक रुपयासुद्धा सुटबुटातल्या लोकांच्या घोड्यांसाठी वापरु देणार नाही. हे घटनाबाह्य सरकार असून ते लवकरच कोसळणार आहे, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.