मुंबई : केंद्र सरकारनं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्यानं शिथिलता आणताना अनलॉकला सुरुवात केली. ज्यानंतर अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. ज्यामध्ये अखेर महाराष्ट्रातही आंतरजिल्हा प्रवावासाठी सक्तीचा असणारा ई- पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातच भर म्हणजे आता मध्य रेल्वेकडूनही राज्यांतर्गत रेल्वे प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत फक्त लांब पल्ल्याच्या सध्या चालत असलेल्या स्पेशल गाड्यांसाठी प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केलं आहे.  


सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे असंही रेल्वेनं म्हटलं आहे. देशभरामध्ये मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. 



 


दुसरीकडे मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष मर्यादित लोकल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मुंबई लोकलबद्दल मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यादरम्यान मध्य रेल्वेने राज्य सरकारच्या unlock ४ च्या सुचनेप्रमाणे आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे.