मुंबई :  राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. ( Rain in Maharashtra)15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Again Rain in Maharashtra, Meteorological Department warning) जुलै महिन्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले. कोकण आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवला. चिपळूण, महाड, कोल्हापूर, सांगली येथे महापुराने अनेकांचे संसार हिरावून घेतले. अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. तर काही ठिकाणी दरड कोसळून घरेच गाढली गेली. आता पुन्हा हवामान विभागाने राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. कोकणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात मुंबई, कोकणसह विदर्भात सर्वदूर पाऊस झाला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. आता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात पावसात घट होईल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. 



12 जुलैला कोल्हापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाट विभागात जोरदार पाऊस झाला. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवसांत जोरदार पाऊस झाला.


दरम्यान, आज जारी  केलेल्या विस्तारित पूर्वानुमान नुसार या महिन्याच्या मध्यापासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस परतण्याची शक्यता दिसत आहे. येत्या आठवड्यात मात्र  पावसाची ओढ कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती IMDने दिली आहे.