Abdul Sattar Controversies : आपल्या वादग्रस वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आणखी एक कारानामा समोर आला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेला सिल्लोडचा कृषी मोहोत्सव (Sillod Agricultural Festival) वादात सापडला आहे.  कृषी मोहोत्सवासाठी निधी गोळा करण्याच्या नावावर अब्दुल सत्तार यांनी खंडणी गोळा केल्याचा खळबळजनक आरोप विरोध पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केला आहे(Maharashtra Politics). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कृषी महोत्सवासाठी अधिका-यांना, कृषी केंद्रांना निधी जमवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विरोध पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी अजित पवारांनी केलीय. या प्रकरणाची सरकार गंभीर घेईल आणि चुकीचं आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. 


काय आहे नेमकं प्रकरण?


सिल्लोड येथे कृषी महोत्सव होणार आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या महोत्सवासाठी कृषी खात्याला पाच कोटी रुपये वर्गणी गोळा करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याचे खात्रीशीर वृत्त मिळाले असल्याचा दावा  प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.


कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कोट्यावधी रुपयांची वर्गणी जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.


कृषी महोत्सवात प्रवेश आणि व्हीआयपी प्रवेशासाठी चार प्रकारचे पासेस तयार करण्यात आले आहेत. प्लॅटिनम साठी 25 हजार, डायमंड साठी पाच हजार, गोल्ड साठी दहा हजार , सिल्वर प्रवेशिकेसाठी पाच हजार रुपये असे चार प्रकारचे प्रवेशिका कृषी विभागाकडून सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवल्या आहेत. 


या प्रवेशिका प्रत्येक तालुका कृषी अधिकारी मार्फत तालुक्यातील खते आणि किडकनाशी बियाणे विक्रेत्यांना द्यायचे असून त्या बदल्यात पैसे गोळा करून त्या कार्यालयाकडे जमा करण्याचे तोंडी सूचना दिले असल्याची माहिती मिळत आहे.
अब्दुल सत्तार यांनी कोट्यावधी रुपये कृषी महोत्सवासाठी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. सदर बाब अतिशय गंभीर असून  सत्तार यांनी आपल्या कृषी मंत्री पदाचा गैरवापर केला आहे. म्हणून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. 


हिवाळी अधिवेशनात(Maharashtra Winter Session 2022 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर घोटाळ्याचा गंभीर आरोप झाला आहे. तत्कालीन महसूल राज्यमंत्री असताना सत्तार यांनी वाशीममधील 37 एकर गायरान जमिनीचं वाटप करण्याचा निर्णय घेतला. या जमीन वाटपात 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे.